कर्जमाफीसाठी प्रतीकात्मक काळी गुढी उभारून स्वाभिमानीचे आंदोलन

मधुकर केदार अहमदनगर.राज्याचे मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांनी शेतकरी कर्जमाफीच्या आश्वासन पूर्ण न केल्यामुळे मराठी नववर्षाच्या निमित्ताने जिल्हाधिकारी यांच्या कार्यालयासमोर शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी शेतमालाची प्रतीकात्मक काळीगुढी उभारून लक्षवेधी आंदोलन स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने कऱण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा उपाध्यक्ष दत्ताभाऊ फुंदे यांनी दिली.
जिल्हाधिकारी यांना दिलेले निवेदनात म्हटले आहे की, राज्य सरकारमधील महायुतीच्या नेत्यांनी निवडणूक जाहीरनाम्यामध्ये तसेच प्रचार सभेत शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी करण्यात येईल असे आश्वासन दिले होते. त्यानुसार शेतकऱ्यांनी महायुतीच्या उमेदवारांना भरघोस मतांनी निवडून दिले. व राज्यात महायुतीची एकहाती सत्ता आली. मात्र आता महायुती सरकारला शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा विसर पडला आहे.
त्यातच काल राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांनी शेतकऱ्यांनी कर्जमाफीच्या आशेवर बसू नये, राज्य सरकार शेतकऱ्यांची कर्जमाफी करणार नाही. येत्या ३१ मार्चपर्यंत सर्व शेतकऱ्यांनी आपले कर्ज भरावे असे वक्तव्य करत कर्जमाफीच्या आपल्या भूमिकेवरून घुमजाव केले.त्यामुळे शेतकऱ्यांची घोर निराशा झाली आहे.
आधीच शेतमालाला हमीभावही मिळत नसल्याने शेतकरी आर्थिक विवंचनेत आहेत. गेल्या तीन वर्षापासून नैसर्गिक आपत्ती व शेतमालाला हमीभाव मिळत नसल्याने शेतकऱ्यांना आपल्या मालाचा उत्पादन खर्चही निघत नाही. त्यामुळे कर्ज भरावी तरी कशी या चिंतेत शेतकरी सापडला आहे.
त्यामुळे स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने राज्य सरकारचे कर्जमाफीकडे लक्ष वेधण्यासाठी अहिल्यानगर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी शेतमालाची प्रतिकात्मक काळी गुढी उभारून लक्षवेधी आंदोलन करण्यात येणार आहे. अशी माहिती स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष दत्तात्रय फुंदे यांनी दिली